कररचनेत कोणताही मोठा बदल न करता महिला, मध्यमवर्ग अन् शेतकऱ्यांना मदतीचे ‘अंश’ दान देत विकसित भारताचा संकल्प सोडणारा पण त्याचबरोबर ‘अमृत’काळ हाच ‘कर्तव्य ‘काळ असेल, याची जाणीव करून देणारा समतोल अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. मध्यमवर्गाला परवडणाऱ्या घरांचे आश्वासन देतानाच आशासेविकांना ‘आयुष्मान’चे कवच बहाल करण्यात आले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरभक्कम तरतूद करण्यात आली आहे.
संकल्प निधी : 47.66 लाख कोटी
नवी उद्दिष्टे
• आशासेविका, अंगणवाडी सेविकांचा ‘आयुष्मान भारत’मध्ये समावेश
• संरक्षण उद्देशांसाठी सखोल तंत्रज्ञान (डीप टेक) मजबूत करण्यासाठी नवीन योजना
• वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यासाठी तीन प्रमुख रेल्वे मार्गिका योजना
• गरीब, महिला, युवा आणि ‘अन्नदाता’ (शेतकरी) या चार प्रमुख घटकांच्या विकासावर भर
• पंतप्रधान आवास योजने अंतर्गत (ग्रामीण) तीन कोटी घरांचे उद्दिष्ट
• सौर ऊर्जा पॅनेलद्वारे एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज
• ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत ‘यू-विन’ हे नवे व्यासपीठ सुरू करणार
• अध्यात्मिक पर्यटनावर भर
• २०१४ पूर्वीच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढणार
• लखपती दीदींची संख्या तीन कोटींवर नेणार
• भांडवली खर्च ११.१ टक्के वाढीसह ११,११,१११ कोटी म्हणजेच जीडीपीच्या ३.४ टक्के करणार
योजनांचा निधी वाढला
● अर्थचक्राचा महत्त्वाचा घटक असलेल्या योजनांसाठी केंद्राने यंदा घसघशीत तरतूद केली आहे.
● महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी २०२३-२४ या वर्षासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता त्यात वाढ करून ती २०२४-२५ साठी ८६ हजार कोटी रुपये एवढी करण्यात आली आहे.
● राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
● २००९ ते २०१४ या काळात रेल्वेला १ हजार १७१ कोटी रुपये मिळत होते. यात 13 पटीने वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांना जोरदार गती दिली आहे.
● अर्थसंकल्पिय भाषण कालावधी :- 58 मिनिटे
● 2023 या वर्षीचा कालावधी :- 1 तास 27 मिनिटे
● लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परंपरेनुसार दही-साखरेने तोंड गोड केल्यावर, नीलमणी रंगाची नक्षीदार कांथा सिल्क साडी नेसलेल्या आणि पारंपरिक ‘बही-खता’ शैलीतील लाल पिशवीत गुंडाळलेला लेखानुदानाचा ‘डिजिटल टॅबलेट’ हाती असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.
● पंकज चौधरी आणि भागवत कराड हे दोन्ही राज्यमंत्री त्यांच्यासोबत होत्या.
सलग सहावा अर्थसंकल्प
● निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी (गुरुवार )सलग सहावा अर्थसंकल्प सादर करून दिवंगत मोरारजी देसाईंच्या विक्रमाची बरोबरी केली.
● देसाई यांनी 1962 व 1967 मध्ये दोनदा लेखानुदाने व एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर केले होते.