केंद्र सरकारचा अन्नसुरक्षा कायदा अमलात आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे आता महाराष्ट्रात अन्न आयोग स्थापन करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासंबंधीची अधिसूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केली आहे. केंद्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना 2013 या वर्षी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा करण्यात आला . या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्याने अन्न आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. हा कायदा अमलात येऊन दहा वर्षे झाली त्यातील अनुच्छेद 16 नुसार राज्य सरकारने आता राज्यात अन्न आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र अन्नसुरक्षा नियम 2023 चे प्रारूप तयार केले असून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आले आहेत. राज्यात अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या नियमांतर्गत राज्य अन्न आयोग स्थापन करण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची रचना कशी असेल व त्याची निवड प्रक्रिया कशी राहणार आहे तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.